सिरोंचा : येथील गोदावरी व प्राणहिता नदीवर वसलेला राष्ट्रीय महामार्ग 353 C या दोन्ही पुलांवरील निकृष्ट दर्जाच्या दुरुस्ती कामांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे.या कामात वापरल्या जाणाऱ्या साहित्यात दर्जाची कमतरता, कामाचे अपुरे नियोजन आणि वेळेवर काम न होणे यामुळे परिसरातील नागरिक व प्रवासी त्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर सिरोंचा तालुका काँग्रेस कमिटीने प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353C वर तीव्र स्वरूपाचे ‘चक्का जाम’ आंदोलन छेडले . गेल्या काही महिन्यांपासून या पुलांवर पडलेल्या भेगा व खड्डे दुरुस्तीची प्रक्रिया सुरू सदरहू काम हे थातूर माथुर असल्याने येथील नागरिकांनी तसेच स्थानिक काँग्रेस नेत्यांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे लेखी तक्रारी केल्या. मात्र त्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे परिसरातील जनतेमध्ये प्रशासनाविषयी असंतोष निर्माण झाला होता.कामाच्या ठिकाणी सुरक्षेची योग्य व्यवस्था नसणे, वाहतुकीस अडथळा होणे, व अनेक ठिकाणी पडलेल्या भेगा यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावली होती.
या पार्श्वभूमीवर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सतीश जवाजी यांच्या नेतृत्वात आज सकाळी 11 वाजल्यापासून राष्ट्रीय महामार्ग 353C वरील गोदावरी प्राणहिता पुलावर चक्का जाम आंदोलन सुरू करण्यात आले.या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभाग घेतला.आंदोलकांनी निकृष्ट काम बंद करा प्रशासन जागे हो’चांगल्या दर्जाचे कामच मान्य अशा घोषणा देत पुलावरच ठिय्या मांडला होता.या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती.
पुलावरून जाणारी खासगी वाहने, एसटी बस व मालवाहू ट्रक अडकून पडले.नागरिकांना याचा काहीसा त्रास झाला असला, तरी आंदोलनाचा उद्देश मात्र सरकारचं लक्ष वेधण्याचा असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी काँग्रेसच्या या पावलाचे समर्थन केले.
या आंदोलनाची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन हल्लाकल्लोळ झाले होते.स्थानिक प्रशासनाने या चक्काजाम आंदोलनाची तात्काळ दखल घेत,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) प्रतिनिधी आंदोलनस्थळी येऊन काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतर NHAI प्रतिनिधींनी लिखित स्वरूपात आश्वासन दिले. लेखी आश्वासनात म्हंटले की 15 मे 2025 पर्यंत दुरुस्तीचे सर्व काम उच्च दर्जाचे करण्यात येईल व निकृष्ट सिमेंट किंवा साहित्य वापरण्यात येणार नाही.तसेच प्राणहिता पुलावरील पथदिवे लवकरात लवकर सुरु करण्यात येईल.
याशिवाय,पुढे होणाऱ्या कामात स्थानिक जनप्रतिनिधींचा देखील सहभाग घेतला जाईल,अशी ग्वाही देण्यात आली. राष्ट्रीय महामार्गाचे प्राधिकरनाणे दिलेल्या लेखी आश्वासनामुळे तालुका काँग्रेसकमिटीने आपले आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सतीश जवाजी यांनी माध्यमांशी बोलताना म्हंटले कि, “आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून शांततेच्या मार्गाने प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करत होतो.मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले.पुलांवरील दुरुस्ती हे जनतेच्या सुरक्षेचे व अधिकाराचे प्रकरण आहे.आम्ही कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नव्हे,तर जनहितासाठी आंदोलन केले आहेत.
ते पुढे म्हणाले प्रशासनाने आमची मागणी मान्य करून लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन तूर्तास थांबवत आहोत. परंतु जर वेळेत काम झाले नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल.”गोदावरी व प्राणहिता पुलांवर काँग्रेसने केलेले चक्का जाम आंदोलन हे प्रशासनाला जाग आणण्यासाठी एक प्रभावी पाऊल ठरले आहे.प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची मुदतीत अंमलबजावणी झाली तर नागरिकांना दिलासा मिळेल.मात्र काम जर पुन्हा वेळेत व दर्जाने झाले नाही,तर स्थानिक जनतेचा रोष अधिक तीव्र होऊ शकतो.येत्या काही दिवसांत प्रशासन आपले वचन पाळते की नाही,याकडे संपूर्ण तालुका वासियांचे लक्ष लागले आहे.
याप्रसंगी जेष्ठ कांग्रेस नेते कृषी.ऊ.बा. संचालक आकुला मालिकार्जून,बाजार समिती संचालक नागराजु इंगिली,सिरोंचा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच रवीभाऊ सल्लमवार,नगरसेवक राजेश बंदेंला, नागेश दुग्याला,शंकर मंचार्ला,मारुती गणंपुरपू,सारय्या सोन्नारी,संपत अंबाला, अब्दुल सलाम, प्रणीत मारगोनीसह कांग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.