![](https://aheritoday.com/wp-content/uploads/2024/06/IMG-20240605-WA0028-scaled.jpg)
![](https://aheritoday.com/wp-content/uploads/2024/06/IMG-20240605-WA0026-scaled.jpg)
अहेरीटुडे न्यूज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी भामरागड ( bhamragad )
भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम अशा येचली येथील इंद्रावती नदी रेतीघाटातून एकाही रेतीची उचल न करता टिपी (वाहतूक परवाना) येचली येथील दाखवून भामरागड,अहेरी तालुक्यातील नवनिर्माणाधिन बांधकामात रेतीचा वापर केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते.यात बनावट दस्ताऐवजाचा आधार घेत शासनाची दिशाभूल करीत कोट्यावधीचा महसूलाला चुना लावण्यात आला होता.या प्रकरणी भामरागड तहसिलदारांनी काही रेतीचा अवैध साठा केल्या प्रकरणी दंडात्मक कारवाई केली होती.मात्र या प्रकरणी महसूल विभागाच्या कोणत्याही अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई न झाल्याने सदर प्रकरण थंडबस्त्यात तर टाकण्यात आले नाही, ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यातील दोषी अधिकारी, कर्मचा-यांवर तत्काळ कारवाई न झाल्यास जिल्हा कचेरीसमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी दिला आहे.सन 2021-22 या आर्थिक वर्षात येचली येथील इंद्रावती नदी रेती घाटाचा लिलाव करण्यात आला होता. नियमानुसार 2120 ब्रास रेती उपसा करण्याचे आदेश होते. मात्र संबंधित कंत्राटदानाने नदीपात्रातून रेतीचा उपसा न करता भामरागड,अहेरी तालुक्यातील नवनिर्माणाधिन कामासाठी चोरट्या मार्गाने रेतीचा वापर करुन येचली येथील रेती असल्याचा दिखावा करण्यात आला.संबंधित विभागाच्या बनावट दस्ताऐवजाचा आधार घेत सदर प्रकार करण्यात आला होता. या प्रकरणी भामरागड तहसिलदारांनी केवळ 563 ब्रास रेतीचा अवैध साठा ठेवल्या प्रकरणी 1 कोटीवर दंडात्मक कारवाई केली होती. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी उपविभागीय पोलिस अधिका-यांकडे तक्रार करीत सदर प्रकाराची सखोल चौकशी करुन शासनाला कोट्यवधीचा चुना लावणा-या संबंधित विभागाच्या अधिकारी,कर्मचा-यांवर कारवाईची मागणी केली होती. मात्र त्यानंतर याबाबत कुठलीही कार्यवाही न झाल्याने सदर प्रकरण थंडबस्त्यात टाकून संबंधित अधिकारी,कर्मचा-यांना अभय दिल्या जात असल्याचा आरोप होत आहे.सदर प्रकरणांची वरिष्ठ स्तरावरुन चौकशी करुन संबंधित विभागातील अधिकारी, दोषींवर तत्काळ बडतर्फीची कारवाई न झाल्यास येत्या आठ दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार, योगाजी कुडवे, नीळकंठ संदोकर , रवींद्र सेलोटे, धनंजय डोईजड,चंद्रशेखर सिडाम, आकाश मट्टामी, विलास भानरकर, शंकर ढोलगे यांनी दिला आहे.