![](https://aheritoday.com/wp-content/uploads/2024/06/IMG-20240605-WA0028-scaled.jpg)
![](https://aheritoday.com/wp-content/uploads/2024/06/IMG-20240605-WA0026-scaled.jpg)
गडचिरोली : राज्य शासनाकडून तलाठी पदाच्या भरतीबाबत काढण्यात आलेल्या जाहिरातीत गडचिरोली जिल्ह्यात ओबीसी उमेदवारांसाठी एकही जागा राखीव ठेवली नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दिलेल्या 18 टक्के आरक्षणानुसार पदभरतीची नव्याने जाहिरात काढा, अन्यथा ओबीसी बेरोजगारांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा ईशारा माजी ओबीसी बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
गडचिरोली जिल्हयात 158 पदांपैकी पेसा क्षेत्रातून 151 पदे व पैसाविरहीत क्षेत्रातून 7 पदे भरण्याची जाहिरात प्रसिध्दीस दिली आहे. यात ओबीसी प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित नसल्याने ओबीसी समाजातील तरुण-तरुणी रोजगारापासून वंचित राहणार आहे. असे घडल्यास ओबीसी समाजाच्या भावनांचा उद्रेक होऊन शासनाला मोठ्या जनआक्रोशाला सामोरे जावे लागेल. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता सदर भरती प्रक्रिया तातडीने स्थगित करून ओबीसी प्रवर्गासाठी जागा आरक्षित ठेवून नव्याने भरती प्रक्रिया घेण्यात यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात गडचिरोली जिल्ह्यातील वर्ग 3 व वर्ग 4 च्या पदभरतीमध्ये ओबीसींना 18 टक्के आरक्षण देण्यात आले होते. मात्र राज्यात झालेल्या सत्ता बदलानंतर ओबीसींवर पुन्हा अन्याय सुरू झाला, असा आरोप त्यांनी केला.